जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – 6
Date: September 15th, 2019 by Mandar Abhyankar / Total comments: 0 / Posted in Agriculture, Wardha, World News

नमस्कार
परत एकदा माफी
लिहण्याची सवय नसल्याने असे होतं आहे. लिखाणात सातत्य ठेऊ शकत नाहीये.
त्याबद्दल मनःपूर्वक माफी…
मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे
विकासाच्या संकल्पनेला समजून घेऊन आम्ही आमची जगण्याची पद्धती बदलली.
म्हणजे नेमके काय केले?
मागील लेखात आपण पाहिलं की विकास आपल्याला कोणत्या दिशेत घेऊन जात आहे.
तर आजचा GDP आधारित विकास हा More Production-More Consumption कडे आपल्याला घेऊन जातो. त्यातून समस्या shift होतात, त्यात भर पडते.
त्यातूनच हवा, पाणी,अन्न यांचे प्रदूषण झाले-चालू आहे. या माणसाच्या अति बेसिक गरजा आहेत. त्याच जर प्रदूषित असतील तर कसे होणार?
म्हणून मग आम्ही शेती करण्याचा विचार केला. शेती करण्यासाठी गावात राहावे लागणार होते जिथे हवेचे प्रदूषण अत्यंत कमी आहे, पाण्याचे ही प्रदूषण कमी आहे आणि अन्नासाठी शेती करायची असल्याने त्याचेही प्रदूषण जवळपास शून्य होणार होते.
ह्याची सुरवात साधारण 1990 च्या आसपास झाली. बाबांना जाणवले की पुढील पिढीला नोकरी मिळणे कठीण होणार आहे, जगणे कठीण होणार आहे. त्यासाठी काय करता येईल हा असा विचार करत असताना, एकट्याने कदाचित अवघड जाईल बदल करणे म्हणून त्यांनी सन्मित्र मंडळाची सुरुवात केली. या मध्ये जवळपास 50 लोकं होते. त्यात विविध जाती धर्माचे, विविध क्षेत्रातील लोकं होते- सन्मित्र हा criteria होता.
सन्मित्र मंडळाची महिन्यातून एक बैठक होतं असे. त्यात मुलांसाठी काय करता येईल हा विषय प्रामुख्याने असायचा. इतरही विविध विषयांवर चर्चा होत असे. बदल हे एकट्या पुरुषाने विचार करुन होणार नाहीत म्हणून परिवाराचा त्यात समावेश अधून मधून होतं असे मग तो एखादा कार्यक्रम असो वा एखादी ट्रिप. या मेळाव्यातून परिवारा समोर विषय मांडले जायचे. त्यातून साधक-बाधक चर्चा होतं असे.
इतरवेळी झालेली चर्चा घरी मांडली जावी हा विचार होताच. आणि ती आमच्या घरी होतं असे. त्यातून विविध विषयांवर आमच्या घरी चर्चा रंगत असे. कधी कधी कंटाळवाणे वाटे पण विचार करायला प्रवृत्त होतं असे.
हे चालू असतांनाच बाबांना एकेदिवशी श्री. दिलीप कुलकर्णी यांचा “मुक्त अर्थव्यवस्थेची कृष्णछाया” हा लेख वाचायला मिळाला. त्यात आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेमुळे समाजावर, रोजगारावर कसा असर पडणार आहे याबद्दल लिहले होते. त्यातच दिलीप काकांच्या पुस्तकांची माहिती दिली होती. ती वाचून बाबांनी दिलीप काकांची पुस्तके मिळवली- “सम्यक विकास” आणि “निसर्गायन”. त्यांचे वाचन झाल्यावर ती पुस्तके त्यांनी आम्हालाही वाचायला दिली. वाचायची आमच्या घराला पहिले पासूनच आवड असल्याने ही पुस्तके वाचली गेली.
ह्या दोन्ही पुस्तकात अत्यंत सोप्या पद्धतीने विषय समजावून सांगितला आहे.
“सम्यक विकास” मध्ये GDP म्हणजे काय, विकास म्हणजे काय, आजचा विकास- विकास आहे की विनाश, ह्याचे समाजाच्या विविध अंगावर कसे परिणाम होत आहेत ह्याचे अत्यंत मार्मिक विवेचन केलेले आहे. अवघड विषय हा खूप सोप्या भाषेत समजावून सांगितला आहे.
“निसर्गायन” मध्ये विकास आणि आध्यात्म याची सुरेख सांगड घातली आहे.
या दोन्ही पुस्तकातून आमच्या चालू असलेल्या विचारांना खतपाणी आणि मुख्य म्हणजे योग्य दिशा मिळाली.
त्या दिशेबद्दल पुढील लेखात….

