जाणीव विकासासाठी शेती आधारित जीवनशैली – 7
नमस्कार
परत एकदा आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे.
मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे “सम्यक विकास” आणि “निसर्गायन” ह्या दिलीप कुलकर्णी काकांच्या पुस्तकाने आमच्या सन्मित्र मंडळात व घरी चालू असणाऱ्या विचारांना योग्य दिशा देण्याचे काम केले.
आजच्या GDP आधारित विकासाची पोलखोल, त्याचे विविध आयाम आणि मानवीय विकासाची दिशा व त्यासोबत विज्ञान आणि आध्यात्म याची सुरेख मांडणी या पुस्तकात आहे.
आमचा विचार पसरलेला होता त्याला या पुस्तकातून एकसूत्रता मिळाली. स्वतःला व इतरांना आम्ही जीवनशैलीत बदल का करत आहोत हे सांगायला आधार मिळाला. यातून आम्ही करत असलेल्या विचाराच्या दिशेतील आमची समझ आणि विश्वास वाढला. त्यातून आम्ही मग छोटे मोठे बदल जीवनशैलीत करत गेलो. तसेही घरी TV नव्हताच, वाचनाची आवड होतीच, शानशौकीची आवड नव्हती, त्यामुळे आम्हाला हे बदल सोपे गेले. कृती करतांना अधिक विचार होऊ लागला.
याच दरम्यान सेवा, शिक्षण क्षेत्राकडून आम्ही शेती या अधिक मूलभूत गोष्टी कडे वळलो.
दरम्यान सन्मित्र मंडळातील बाबांसहित तीन जण मिळून कुडावळे ता.दापोली येथे जाऊन दिलीप काकांना भेटून आले. छान चर्चा झाली. ते वर्ष होते 2001!
त्याच वर्षी दिलीप काकांनी “गतिमान संतुलन” नावाने एक मासिक सुरु केले होते. तेंव्हापासून ते आजगायत आमच्या कडे येते. या मासिकातून पर्यावरण विषयक, जीवनशैली विषयक विचार सातत्याने मांडले जात आहेत. त्याचे विविध विषयांवरचे विशेषांक ही निघतात. यावेळच्या विशेषांकाचा विषय आहे
“मृत्यूदूत मोबाईल”!!!
मागचे 18 वर्षे चालणाऱ्या या अंकाची वार्षिक वर्गणी आहे फक्त ₹ 30!
“पर्यावरणाशी कृतिशील नातं” अशी त्याची Tag line आहे. नुसते वाचन नसावे तर त्याला कृतीची जोड द्यावी हीच या मांडणी मागची भूमिका आहे. दिलीप काका व पौर्णिमा काकू यांनी आधी स्वतःच्या जगण्यात बदल केले नि मग इतरांना सांगायला सुरुवात केली. आणि म्हणून त्यांची मांडणी प्रभावी आहे. म्हणूनच गांधीजींनी सांगितलेले
“Be the change you want to see in the world” हे वाक्य फार महत्वाचे आहे.
सध्याच्या काळात व्यवस्थेविरुद्ध लढण्याची परिस्थिती अनुकूल नाहीये. म्हणून मग स्वतःच्या जीवनशैलीत बदल करणे जास्त सोपे नि योग्य आहे. वेळ येईल त्यावेळी व अधून-मधून व्यवस्थेशी लढत राहू. मात्र स्वतः मध्ये बदल केल्याशिवाय इतरांवर प्रभाव पडणार नाही हे नक्की!
याच आधारावर आम्ही बदलला सुरवात केली.
यातून शेतीकडे कसे वळलो हे पुढील लेखात.
